Sunday, September 12, 2010

कुणी अभंग म्हणता...

कुणी अभंग म्हणता मन ओसंडून जाते...
कुणी म्हणता ओवी डोळा पाणी येते...
मी देव हरवला कधीच माझ्यामधला...
ती जुनी कहाणी पुन्हा नव्याने स्मरते!

या वैराणातून कधी बगीचा होता...
स्वर ढाला माझा कधी टिपेचा होता...
प्रार्थना जायच्या थेट नभाशी तेव्हा...
घन भरला; केवळ बरसायाचा होता!

मी निरांजनेही कधि लावली होती
अन् स्तोत्रामधुनी फुले ठेवली होती !
कळले न कधी विझलीच सवय श्रद्धेची
जी अंधारातील एकच दिवली होती!!

काजळीच केवळ दिव्यात उरली आता
काळजी काळजावरी उतरली आता!
गोंगाट असा या देहाने मांडीयला
आवाज आतला ऐकू न येई आता!!

भोगात म्हणावे रमलो तर का ऐसे?
मी 'हवे हवे' म्हणताही सर्व नकोसे?
बेशुद्धीला ही शुद्ध कुणाची उरली?
हे कोण टाकते अजुनी आत उसासे?

ही कसली थरथर अजुन अधरावरती?
ही कसली लाली अजुन रूढीरावरती?
हे कोण बोलते अजुन माती ओळी?
हा कसा शहारा अजुन बधिरावरती?

कुणी अभंग म्हणता मन ओसंडून जाते...
कुणी म्हणता ओवी डोळा पाणी येते...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment