Showing posts with label नेणिवेची अक्षरे. Show all posts
Showing posts with label नेणिवेची अक्षरे. Show all posts

Saturday, June 25, 2011

झोप

झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

बायको...मुलगी...नातवंडं...पतवंडं...
विझल्या दिव्यातील निद्रिस्त अंधारातून,
काळोखाच्या तळाशी
अंधारल्या खोल्यांतून...माजघरातून...
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

स्ट्रॉमधून कोल्ड्रिंक शोषून घ्यावं
तसे खोल श्वासातून झोप ओढून घेतायत कणाकणांतून...
मिटक्या मारतायत...!
कसलंच भान नसल्याचं किती उत्तान समाधान
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर...
करंडीत रचून ठेवलेल्या स्तब्ध सफरचंदांसारखे
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

कुशीवर...पाठीवर...पोटावर...
उतरत्या झोपेसाठी प्रत्येकाचा वेगवेगळा तळ...!
भरून निघतायत ओल्या सुक्या जखमा, शरीरांच्या झिजा...
तयार होतायत पोटात आपसुकपणे आयुष्याचे रस...अन्न पचतंय...
बाळ मोठी होतायत...केस पिकतायत...हळू...हळू...
रेल्वेच्या एअरकंडीशन्ड डब्यात बसल्यासारखा
किती शांतपणे पार पडतो आहे
अंतापर्यंतच्या प्रवासातला हा निद्रेचा टप्पा...

रोजच्या रोज अनेक अंगांनी छळून छळून घेताना
'टाईम प्लीज' म्हणत स्वत:लाच सूत दिल्यासारखे...
'जगण्याचा आळ नको अन् मेल्याचे दु:ख नको' म्हणत म्हणत
झोप घेतायत सारे...झोप घेतायत...

-संदीप खरे

Sunday, June 19, 2011

तथास्तू !

सारे करून थकल्यावरती रेंगाळशीलच टाकत श्वास
मागे बघत पाऊलखुणा शोधात राहशील सत्याभास
'इतके चालत आलो आपण? 'म्हणशील चोळत आपले पाय
'वाटेमधले इतके पक्षी, झाडे...त्यांचे झाले काय ?'
त्यांच्यासाठी इतकाच रस्ता, इतकेच अंतर असते जाणे
आपण आपले मानत अस्सल नंतर होतो केविलवाणे !
अंगांगाचा दाहक टाहो, डोळे थिजून होतील थंडी
डोक्यावरती सूर्यास्ताची उजळत असेल झुंबरहंडी
पाखरे उगाच चुकली माकली घरटी शोधात असतील हिंडत
तळे- ते ही गदगदलेले...पायांवरती लाटा सांडत
आणखीन होशील उदास उदास, मनात खोल मावळशील
दगड, डोंगर, झाडे, वाटा....ह्यांच्याइतका साकळशील
तेव्हा दुरून बघणारा मी, हलके हलके देईन हात
रक्तामध्ये फुंकिन वारा...शरिरातील सरकाविन वात
मागता मागता थकून जेव्हा म्हणशील - 'आता नकोच घेणे !'
तेव्हा गुपचूप देऊन टाकेन 'तथास्तू' चे अंतिम देणे !!

-संदीप खरे

Monday, June 13, 2011

वेळ वाईट लागली...

संपले अवघे उत्सव आणि गर्दी पांगली
पालखी आता जिण्याची, बघ रिकामी चालली

ऊन्ह आले मावळू आणिक या दुनियेपरी
-माझियापासून पळते लांब माझी सावली

एवढी वाटे हवीशी ऊब अज्ञानातली
शक्यतांची शक्यताही मग नकोशी वाटली !

कोण हे म्हणते कधि जमली न मज सौदागिरी
अक्षरांतुन वेदना विक्रीस आहे काढली !

दूषणे कोणास द्यावी अन् कशासाठी इथे ?
माणसे होती भली रे...वेळ वाईट लागली !!

-संदीप खरे

Sunday, June 5, 2011

बोलाया काही ना उरले...

खरे तुला सांगू का राणी ? बोलाया काही ना उरले
कलेवरातून शब्दांच्या या प्राणासम हे अर्थ उडाले || धृ ||

क्षणाक्षणाच्या हिंदोळ्यावर
परस्परांचे परिचय घडले
दर्पणात डोकावू जाता
परस्परांचे चेहरे दिसले !
अतिपरिचय हा झाला बहुधा, अन् पाऱ्याचे रंग पुसले || १ ||

होती म्हणु या भेट प्राक्तनी
होते संचित जितुके तोवर...
प्रश्न अता उरलाच कुठे हा
कोण चूक वा कोण बरोबर !
तुजला खात्री कोणाचेही कोणावाचुन कधी न अडले || २ ||

विरंगुळ्यास्तव दु:ख हवे तुज
उत्कटतेची कृत्रिम लाली !
तुझ्या सुशोभित जगण्यासाठी
फुले कागदी चिकार झाली !
सत्य नको स्पर्शाया जाऊ; ते तव कक्षेच्या पलिकडले ! || ३ ||

-संदीप खरे

Sunday, May 29, 2011

आई घरात नसते तेव्हा...

आई घरात नसते तेव्हा, घरात घरच नसते तेव्हा...
सगळे कसे होऊन जाते कोणी 'स्टॅच्यू' म्हटल्यासारखे...
शेल्फवरचे डबे सगळे होऊन जातात शिळे शिळे...
कढई राहते काकडलेली, फ्रिज म्हणतो 'ऊब दे'
टेप म्हणतो 'माझे गाणे मलाच ऐकू येत नाही'
शोकेसमधल्या वस्तू म्हणतात 'एका जागी गंमत नाही'
सगळे दिवे चालू राहतात फॅनसुद्धा राहतो फिरत
गिझर पोटी राहते भीती 'कोण बंद करील परत ?'
सगळे कपडे ओरडतात 'पाणी द्या, इस्त्री द्या'
शर्टवरची कॉलर म्हणते- 'कोणी माझी काळजी घ्या !'
केरसुणी तर खचून जाते, तिची 'धनिण' नसते आता
कोपऱ्यामधल्या कचरापेटीस दिवस दिवस उपास आता
छतावरचा कोळी म्हणतो -'बांधा घर ! गनिम नाही !'
भिंती म्हणतात, आमच्या आतून घर आहे वाटत नाही !'
धूळ म्हणते 'किती दिवस अशी वेळ शोधत होते !'
घरासकट मनावरती थर थर साचत राहते!...
आई घरात नसते तेव्हा...

घरामधल्या शांततेचा आता तडकत जातो पारा
देवापुढल्या समईचा उतरत जातो अवघा तोरा
माझी कविता म्हणते 'आता तुला डोळ्यात ठेवील कोण ?'
जगासाठी पिसा तू, तुला शहाणा म्हणेल कोण ?'

दाटून यावे दात मळभ आणिक पाउस पडूच नये
तसे कोंडत जाते मन आणिक मिळत नसते वारा !
आई नसते तरीही दिसते सगळी माया उभी परसात
एकाकीपण सांगत राहते -'भिंतींना डोळे असतात !''...
                                 ....आई घरात नसते तेव्हा
                                 घरात घरच नसते तेव्हा...

-संदीप खरे

Saturday, May 21, 2011

गाणे न शिकलेले गुलाम अली

गाणे न शिकलेला गुलाम अली
असू शकतो एखादा न्हावीही
कंगव्यात आलेली गिर्‍हाईकाची बट
रूपकच्या सात मात्रात कापून काढणारा,
व एखादा चांभार
झपतालाच्या पाचव्या मात्रेत
खिळा अचूक चपलेत घुसवणारा...

नशिबाने ज्यांचा हात तंबोऱ्यावर पडूच दिला नाही
असे कितीतरी भटकत असतील रानोमाळ
फुत्कारत फिरणाऱ्या नागसापांसारखे

त्यांची गाणी पडतात विखरून
चांदण्यातल्या मालाच्या छातीवर,
रानातल्या फांद्यांवर, नद्यांच्या लाटांवर...
पण त्यांच्याही छातीत असतो
तोच लखलखणारा सोन्याचा गोळा
तेजाळतो आतून
तोच स्वच्छ, ताजातवाना करणारा स्वयंसिद्ध सूर...
आयुष्याच्या अनवट रागात लीलया संचार करणारी
तीच स्वरांची झिंग...

गाणे न शिकलेले गुलाम अली
गात गात धार काढतात तेव्हा पान्हावते कपिला !
वल्ह्याने लाटा कापतात तेव्हा लाटाळते सरिता...!
मुक्त कंठाने चुंबून घेतात टीपेचे स्वर
तेव्हा डोंगररांगांचे माथे 'वाहवा' म्हणत झुकवतात माथे !

गाणे न शिकलेल्या गुलाम अलींचे स्वर विखुरतात पृथ्वीभर
खऱ्याखुऱ्या प्रार्थनेसारखे पोहोचतात अंतराळात...
लळा लावतात चंद्र सूर्य ताऱ्यांना...अगणित आकाशगंगांना...

बेफिकीर असतात गाणे न शिकलेले गुलाम अली
गाणे म्हणजे काय हे कधीच न कळता
गात गात उठतात
गात गात दिवसांच्या ओट्या भरतात
अन् स्वच्छ छातीने आयुष्य अंगावर घेत
गात गात झोपून जातात...

अजूनही सांताक्लॉजसारखा
वर्षानुवर्ष फिरणारा असदुल्लाखा गालिबचा आत्मा
त्यांच्या श्रांत चेहऱ्यावर
हात फिरवत फिरवत गुणगुणतो-
' खाक में क्या सूरते होंगी कि पीनहा हो गई |
सब कहा कुछ लाला ओ गुल में नुमाया हो गई |'

-संदीप खरे

Wednesday, May 11, 2011

तंबोरा

एक तंबोरा होता माझ्याकडे
काळ्या शिसवीचा...चकाकता...
घराण्यात या हातातून त्या हातात वाजत आलेला...
येता जाता कोपऱ्यावर नेहमीच नजर जायची तिथे...

लहानपणी कोणीच हात लावू देत नसे त्याला
पण सांगत कि एक दिवस तुला घ्यायचाय तो हातात...
अन् मलाही होते ठाऊक निश्चित
कि एक दिवस घेणार आहे तो मी हातात...

खूप लक्ष असं दिलंच नाही मी त्याच्याकडे
पण अगदी धूळही बसू दिली नाही त्याच्यावर...
आणि तारा मात्र कटाक्षाने ठेवत आलो सुरात...
कोण जाणे कुठल्या क्षणी मैफिल चालू होईल...
आणि त्या चार तारांवर जन्म लावावा लागेल...!!

बरेच दिवस झाले...बरेच महिने...बरीच वर्षे झाली...
इमारती पडल्या..त्यातील माणसे कोसळली...
ओठांवर प्रौढत्वाची एक काळी लकेर आली...
वेगळ्या प्रकारची पण तारेवरचीच कसरत करत राहिलो...
येता जाता दिसायचा देवघरातल्या नंदादीपासारखा
वाटबघता तंबोरा...त्यावरची खानदानी, हस्तीदंती नक्षी...
हलकेच हात फिरवत म्हणायचो-
'होणार ! एक दिवस मैफिल सुरु होणार...'

घरी आलेले पाहुणेही तंबोरा बघायचे...हळहळायचे...
म्हणायचे- 'आमच्या घरी असा तंबोरा असता तरss...'
- आणि पुढे त्यांच्या कल्पनाच अडायच्या...!!
मी हसायचो...हसायचो फक्त...
तंबोऱ्याच्या जुन्या मैफिलींचा इतिहास सांगताना
त्यांच्यासह माझेही उसळायचे रक्त...

पाहुणे निघून जात...नजरेत ठेवून एक हळहळती सहानुभूती...
मी ही त्यांच्यामागच्या रिकाम्या घरात
छताझुंबरांना साक्ष ठेऊन
गवसणी चढवताना पुटपुटायचो,
होणार...एक दिवस मैफिल सुरु होणार...!!

असे अलगद उगवले मावळले सूर्यचंद्र
कि आठ आठ तासांच्या निजेचे थांबे घेत
कसे झपाटले आयुष्य कळलेच नाही...
फार दिवस खोकला बराच झाला नाही...
तेव्हा सहज वय पहिले...
आणि घाईघाईने येऊन तंबोरा हाती घेतला...
वाटले- याहून कुणी शंकराचे धनुष्य हाती दिले असते
तर बरे झाले असते...!

कोणीच बोलले नाही मग...
ना घर...ना दार...
ना भिंतीवरच्या तसबिरी...ना खालचा गालिचा...
केव्हाच उडून गेलेले असावेत देहातले प्राण
तसा गारठलेला अबोलाच सर्वत्र...सभोवार...
एखादा अटळ...घनगंभीर षड्ज लागून रहावा तसा !
वाट पाहत राहिलेल्या माझ्या शहाणपणाच्या
लक्षात येत गेले हळूहळू
मैफिल कधीच सुरु झाली होती खरं तर...
तंबोऱ्याच्या जन्मापासूनच !!

आता दिवाणखाण्यातल्या कोपऱ्यात
जिथे अजूनही तंबोरा आहे
तिथे फार क्वचित खेळू देतो मी माझ्या मुलाबाळांना...
धक्का लागून तंबोरा फुटला
तर 'मैफिल चालू व्हायला हवी होती'
इतकेही वाटणार नाही त्यांना...

-संदीप खरे

Monday, April 11, 2011

अन्यथा...

भर दुपारी, भर रस्त्यात, भर गर्दीत
जाणवणारही नाही तुम्हाला त्यांचं अस्तित्व
पण रात्रीच्या निर्जन प्रहरात
एकट्यादुकट्याने रस्त्यावरून फिरताना
अचानक अंगावर येतील ते
दबा धरून बसलेले...
समूहाने धावणारे...
दिसेल तिथे चावणारे !

एकट्यादुकट्यांनो,
तरीही थांबवू नका
अशा काळोख्यावेळीही
रस्त्यावरून फिरण्याचे
अन्यथा
रस्त्याला सवय होऊन जाईल
निर्जन राहायची !!...

-संदीप खरे

Sunday, April 3, 2011

नको करू सखी...

नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार ?

कशाला रेखिशी अशी छ्टेल भिवई ?
माझ्या मरणाची उगा उठेल आवई !

कशासाठी घालायचे काजळ डोळ्यांत ?
गर्द डोहावर राणी पसरेल रात!

कशास द्यायची अशी मुखाला लखाकी ?
आधीच विरह! त्यात पौर्णिमा व्हायची!!

उटीत लपेटू नको काया धुंदफुंद !
चांदण्यात भिनतील चंदनाचे गंध !

नको करू सखी असा साजिरा शृंगार
अंगावर पडतील अनंगाचे वार !

-संदीप खरे

Friday, March 25, 2011

तिला मी बघितले जितुके...

तिला मी बघितले जितुके, कुणीही बघितले नाही
तिला बघणेसुद्धा आता जरुरी राहिले नाही

तिच्या एकाच या स्पर्शातुनी पडल्या विजा लाखो
कसे आश्चर्य की माझे हृदय हे थांबले नाही !

त्यांनी मोजली माझीच पापे न्याय देताना
तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही !!

तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासांना
तिचे हे वागणे वाटे तिलाही झेपले नाही !!

कसा सुचतो तिला शृंगार हे मज समजले नाही
कसे सुचले मज गाणे तिला हे उमगले नाही !

कशा व्याख्या तयांना समजवू मी धुंद होण्याच्या ?
तिला प्रत्यक्ष त्यांनी एकदाची पाहिले नाही !!

कसे छळतेच आहे वाक्य ते दोघांशी आम्हा
तिला जे बोललो नाही, तिने जे ऐकले नाही !!

तिच्यासाठी निघाले प्राण, सरले भान जगण्याचे
तिचे काही स्वत:चे एकदाही बिघडले नाही !

तिने चुरडून मेंदी लावली हातास प्रेमाने
तिने आयुष्य माझेही असे का चुरडले नाही ?

मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटवली सारी
असा झालो फरारी मी पुन्हा मज पाहिले नाही !!

असा होतीस माझा शब्द तू आत्म्यातला हळवा
तुला मी गिरवले होते; कधिही मिरवले नाही !

-संदीप खरे

Monday, March 14, 2011

मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल

मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल
सुंदर स्वप्ने पडत असतील, पण कुशीवर वळेल...उसासेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

तिच्यासमोरही तेच ढग...जे माझ्यासमोर
तिच्यासमोरही तेच धुके...जे माझ्यासमोर
तिचे माझे स्वल्पविरामही सारखे,अन् पूर्णविरामही !
म्हणून तर मी असा आकंठ जागा असताना
तिचीही पापणी पूर्ण मिटली नसेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

बगिचे लावले आहेत आम्ही एकत्र...एकाकी
माती कालवली आहे आम्ही चार हातांनी
नखात आहे माती आम्हा दोघांच्या...अजूनही !
मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या... अजूनही !
कधी बोलीच वेगळी लावली...कधी फासेच वेगळे पडले
पण काळ्यापांढऱ्याचा एकच पट उलगडलाय मनात दोघांच्याही !
हजार मैल अंतरावरही एकच गाणे सुरू असेल
एकच लय भिनत असेल...एकाच क्षणी सम पडेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत
दोघांच्याही ओठांवर एकमेकांची भाषा आहे
दोघांच्याही मनभर एकमेकांच्या शुभेच्छा आहेत
दोघांच्याही डोक्यांवर एकमेकांचे आशीर्वाद आहेत...
झोपेच्या कागदावर जाग्रणाच्या अक्षरांनी मी कविता लिहीत असेन !
तिकडे उगाच असह्य होऊन असोशी ती पाणी पीत असेल...
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र; आणि मी जागाच असेन
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत रहावी नदी तशी ती ही जागीच असेल...
मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल...

-संदीप खरे

Tuesday, February 22, 2011

काय रे देवा...

आता पुन्हा पाऊस येणार
मग आकाश काळंनिळं होणार
मग मातीला गंध फुटणार
मग मध्येच वीज पडणार
मग तुझी आठवण येणार...
काय रे देवा...

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार...
मग मी ती लपवणार...
मग लपवूनही ती कुणाला तरी कळावंसं वाटणार...
मग ते कुणीतरी ओळखणार...
मग मित्र असतील तर रडणार...
नातेवाईक असतील तर चिडणार...
मग नसतंच कळलं तर बरं असं वाटणार...
आणि या सगळ्याशी तुला काहीच
घेणं-देणं नसणार...काय रे देवा...

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार...
मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार...
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार...
मग साहिरनी लिहिलेलं असणार...
मग ते लतानी गायलेलं असणार...
मग तू ही नेमकं आत्ता हेच गाणं
ऐकत असशील का असा प्रश्न पडणार
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार
मग ना घेणं ना देणं पण फुकाचे कंदिल लागणार...
काय रे देवा...

मग खिडक्यांचे गज थंडगार होऊन जाणार...
मग त्याला आकाशाची आसवं लगडणार...
मग खिडकीत घट्ट बांधुन ठेवलेल्या
आपल्या पालथ्या मुठीवर ते टपटपणार
मग ५ फूट ५ इंच देह अपुरा अपुरा वाटणार
मग उरी फुटुन जावंसं वाटणार
छाताडातून हृदय काढुन
त्या शुभ्र धारांखाली धरावंसं वाटणार...
मग सारंच कसं मूर्खासारखं
उत्कटं उत्कटं होत जाणार
पण तरीही श्वासांची लय
फक्त कमी-जास्त होत राहणार...
पण बंद नाही पडणार !...
काय रे देवा...

पाउस पडणार
मग हवा हिरवी होणार...
मग पानापानांत हिरवा दाटणार...
मग आपल्या मनाचं पिवळं पान
देठ मोडून हिरव्यात शिरू पाहणार...
पण त्याला ते नाही जमणार...
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार...
मग ते ओशाळणार...
मग पुन्हा शरीराशी परत येणार...
सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार
चहाच्या पाण्यासाठी फ्रिजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधणार
एसडीचं गाणंही तोपर्यंत संपलेलं असणार
रेडियोचा स्लॉट भरलेला असणार...
मग माझ्या जागी मी असणार...तिच्या जागी ती असणार...
कपातलं वादळ गवती चहाच्या चवीने
पोटात निपचित झालेलं असणार.....

पाऊस गेल्या वर्षीही पडला...
पाऊस यंदाही पडतो...
पाऊस पुढल्या वर्षीही पडणार...
काय रे देवा...

-संदीप खरे

Sunday, February 20, 2011

वंदन

मज येते सारे एकच मी का सांगू ?
आभाळजिण्याला एकच ढग का मागू ?
ही नक्षत्रे अन तारे पूर्वज माझे
का कवडीकवडीसाठी क्षुल्लक वागू ?

जे जगण्यासाठी करती लाख बहाणे
घालीन तयांना अगदी सुलभ उखाणे
पडलेच कधी ना असल्या प्रश्नांवरती
हसतील तयांचे दिसतील दात दिवाणे !

मी श्वास मोजतो येत्या लाटांवरती
उच्छ्वास म्हणजे मृत समुद्र भरती !
नशिबाच्या लपल्या खडकावरती येथे
फुटतात गलबते स्वप्न कुणी ज्या म्हणती !

मी आर न येथे पार न ऐसा आहे !
जो नको कुणाला असा भरंवसा आहे !
माझ्याविन कुठला डाव कधी न अडला
पडला न कधी मी ऐसा फासा आहे !

मी माझ्यासाठी तणाव खासा आहे !
मी दुसऱ्यांसाठी बनाव खासा आहे !
ना फक्त जगाला, स्वत:सही जो छळतो
मी असला हट्टी स्वभाव खासा आहे !!

या दारी येते रोज चांदणी एक
ती गतजन्मांच्या पुण्याईची लेक !
या भेटीसाठी केवळ तुटक्या फुटक्या
मी घरात माझ्या रोज घालतो खेप !

जळते दुसऱ्यास्तव ते तर चंदन आहे
रडणे आपुल्यास्तव वृथाच क्रंदन आहे
कळलेच कधी ना कोणासाठी जगला
त्या माझ्या जन्मा माझे वंदन आहे !!

-संदीप खरे

Thursday, February 17, 2011

हसलो म्हणजे

‘हसलो’ म्हणजे ‘सुखात आहे’ ऐसे नाही...
‘हसलो’ म्हणजे ‘दुखले नव्हते’ ऐसे नाही...
‘हसलो’ म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही !…

‘हसलो’ म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
‘हसलो’ कारण शक्यच नव्हते दुसरे काही
‘डोळ्यामध्ये पाणी नव्हते’ ऐसे नाही !

‘हसलो’ कारण तूच कधि होतिस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
‘हसलो’ कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !

‘हसलो’ कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
‘हसलो’ कारण तुलासुद्धा ते खरे वाटते !!
‘हसलो’ म्हणजे फक्त डकवली फुले कागदी
‘आतुन आलो होतो डवरून’ ऐसे नाही...

‘हसलो’ कारण विज्ञानाची ओळख होती
अश्रु जाळण्यामधे जाते अधिक शक्ति !
‘हसलो’ कारण हिशेबास मी दमलो नाही
‘हसलो’ कारण रडण्यामध्ये रमलो नाही !

‘हसलो’ कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे !
‘हसलो’ कारण सत्याची मज भीती नाही
‘हसलो’ कारण फसण्याचा धसका नाही...

-संदीप खरे

Tuesday, February 15, 2011

कसे वाटते...

कसे वाटते सांग मला छळताना ?
मला जाळुनी पुन्हा स्वत: जळताना !

मजा वाटते आणि रागही येतो
शर्यत संपून गेल्यावर पळताना !

तुला पुरावे मिळतील मी असण्याचे
मी नसताना अश्रू ओघळताना !

तुझियावरती पाऊस कोसळताना
आज पाहिले पाणी विरघळताना

एकही नव्हता सोबत गर्दीमधला
वळणापाशी शेवटच्या वळताना !

उल्लू नव्हतो ! स्वत:स रमवत होतो
आस्तिक होऊन मस्तक आदळताना !

नव्या नव्या मज ओव्या सुचती रोज
जुनेच जगणे पुन्हा पुन्हा दळताना !

बघत राहिले जग पेल्यातुन माझ्या
वाफ मामुली विराट वादळताना !

-संदीप खरे

Wednesday, February 9, 2011

नकोस भांडू जगासवे

नकोस भांडू जगासवे अन् नको उगा हट्टाला पेटू
वृधत्त्वाच्या पारावरती कातरवेळी निवांत भेटू !!

फुलून येईल वृक्ष तोवरी संसाराचा ! कर्तव्यांचा !
सहज जाहला असेल तेव्हा खांद्यावरती सूळ जिण्यांचा !
आक्षेपांच्या पैलतीरावर परस्परांना तेव्हा गाठू !

बऱ्याच शिल्लक गप्पा, हसणे आणिक रडणे रुसणे देखिल !
स्थळकाळाचे भान पुसोनी केवळ सोबत असणेदेखिल !
सुकले तरीही गंधित ते क्षण संध्येच्या परडीतून वेचू !!

अंतरातल्या चमचमणाऱ्या हीरकणांची कुणास पारख ?
देहच रुचतो आणिक सुचतो ! देहच अस्तित्वाची ओळख !
कसली भीती विरता यौवन ? भरता घागर ? सरता हेतू !...

नको भेट ही आत्ता तरिही, नको पुढिल जन्माचे बोलू
कुणास ठाऊक पुढल्या जन्मी कोण असू अन् केव्हा भेटू ?
जन्म सांगतो, एका जन्मी जळून घे अन् विझून घे तू !

-संदीप खरे

Thursday, February 3, 2011

काय करते ती खुणा

काय करते ती खुणा अन् काय माझ्या कल्पना
काय बोले सत्य आणि काय माझ्या वल्गना !

एकदा ती हासली अन् जन्म झाला सार्थ हा
क्षणभराची नोंद केवळ; युगभराची वंचना !

एवढेही तू नको घेऊ मनावर शब्द हे !
'जा' तुला म्हटलो खरा मी, पण जराशी थांब ना !

त्या तुझ्या वाटेवरी मज ठेच जेव्हा लागली
गात उठले घाव ते अन् नाचल्या त्या वेदना !

क्रूर हे रस्ते तुझे पण मी ही इतका निश्चयी
टोचत्या काट्यांतस माझे पाय देती सांत्वना !

गाव माझे सोडताना एवढे तू ऐक ना
नाव माझे टाकताना तू उसासा टाक ना !

ऐलदेशी, शुष्क रानी पंख मिटला मोर मी
पैलदेशातून थोडे पावसाळे धाड ना !!

-संदीप खरे

Sunday, January 30, 2011

हुतूतू...

एकटा दगडावरी बसुनी कधीच पाहतो
कैक चालून थांबले; पण मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही, शून्य वाटे पंथही
शून्य वाटे साथ कोणी नाही त्याची खंतही
शून्यता ही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

जीव जडता देतसे जो जिवलगावर जीवही
ज्या स्तुतीही सारखी अन सारखे आरोपही
झेलतो अन पेलतो जो दीपकाचे तेजही
अन दिव्याखाली जमे तो पोरका काळोखही
मानगर्वापार जाऊन सर्व ज्याचे व्हायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

लक्ष सुमनांचा जरीही रोज दाटे सोहळा
लक्षही जावे न तिकडे एवढा तो आगळा
यौवनाच्या रोमरोमी जो शहारा पेटतो
तोच वादळ वाटतो अन तो किनारा वाटतो
ज्यासवे फेकून वल्हे होत नौका जायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ?

ताठ मानेने मनाशी जो स्वत:च्या बोलतो !
वाटले ते सांगते अन सांगतो ते वागतो !!
हासताना हसतो अन क्रंदताना क्रंदतो...
जो सजीवतेचे ठसे साऱ्या क्षणांवर ठेवतो...
उत्कटाच्या उन्ह छायेतून घर बांधायचे

शोधते निष्पापता लोचनांचे आरसे
पौर्णिमा ज्या मनातून चंद्र घेऊन जातसे
एकल्या जखमांसवे जो ओळखीचे बोलतो
वाटते तो बोलताना मीच आहे बोलतो
ज्यामुळे हे जगत जाणे सार्थकी वाटायचे

तीर्थ नेत्री दाटताना स्पर्श अस्पर्शापुढे
हात हातातून येत हर शीतळ व्हायचे
जन्ममृत्यूपार जाऊन पोचलो वाटायचे
उत्कटाच्या छायेतून घर बांधायचे
हुतूतू...

अमेरिकेहून ई-पत्र येते तुझे...
उजळत चाललेली असते तुझी पश्चिम
पण तरीही खूप 'मिस' करत असतोस तू
तुझे आई-बाबा, मित्र, इथले रस्ते, इथले कट्टे
अगदी खड्डे, प्रदूषण आणि धुळसुद्धा...

कपाळाला माती लावून
मांडीवर शड्डू ठोकून, रेघ ओलांडून पलीकडच्या पार्टीत गेलास
तेव्हाच चुकचुकलं होतं खरं तर काही मनात
आता ई-पत्र येते अजुनही नियमित तुझे
पण जाणवते की शब्दांचे पाय
घट्ट पकडून ठेवले आहेत कोणीतरी
आणि संपत चालला आहे दमसास...

वाटते की मायन्यापासून शेवटच्या 'टेक केअर' पर्यंत
आता मजकूर लिहीतच नाहीस तू
वाक्य नव्हेत, आठवणी नव्हेत, आश्वासने नव्हेत
पत्रभर एकच शब्द वाचतो मी आजकाल
हु तू तू तू तू तू तू...

-संदीप खरे

Wednesday, January 19, 2011

जरी

मी जन्मांचे राग जरीही मनात साठवतो
आयुष्याच्या पायापाशी नम्रपणे बसतो

जे जे माझे ते जपण्यास्तव 'रोख' ठोक बनतो
जे ना माझे ते स्वप्नांशी उधार मागवतो !

कळून चुकले जेव्हा सारे ऋतु बेईमानी
पाऊस बघता ऊन्ह; उन्हातुन पाऊस आठवतो !

बंद पापणी बघून गेली स्वप्ने माघारी
तेव्हापासून डोळे उघडे ठेवुनिया निजतो !

कुणि भेटा रे खरेच होऊन वाळवंट सत्त्वे
रोज कितीदा मेघ मनातून माझ्या गडगडतो

आयुष्याच्या पायाशी जरि नम्रपणे बसतो
उलटून त्याचे पाय एकदा पाडावे म्हणतो !

-संदीप खरे

Tuesday, January 18, 2011

कल्पना...

या जगण्याच्या जंजाळातुन
कधी कल्पना जाते स्पर्शुन,
कि हा चंद्रम येत बहरून
झोपेच्या दुलईतून ओढून
हट्ट मांडते ती नाजुकसा,
आणि क्षणांचा फुटे आरसा !
त्या बेभानी विलयानंतर
शमवित श्वासांमधली थरथर
रातराणीच्या आवेगातुन
चंद्रखुणांच्या सांद्र स्वरांतुन
हळू आणते ती धरणीवर
उन्मादाचा निपटत गहिवर !
घरातुनी अंगणात ओढून
हळूच नेते मजला खेचुन
समोर माझ्या बैठक मारून
गुडघ्यावरती माझ्या रेलुन
जरा कपाळी आठी घालून
जरा लाजरे हासुन हासुन
हात कापरे हाती घेऊन
शब्द जरा लाडिकसे लेऊन

मला विनवते - '' म्हण ना काही !
कवितेविण गत्यंतर नाही !
मी लाटेसम फुटले होते
अन ताऱ्यासम तुटले होते
मी पुनवेचे उधाण झाले
लुटवून सारे विराण झाले !
भर ना सखया ओंजळ माझी
सावर सखया भोवळ माझी
हलक्या हाते हळव्या वळी
चितार ना कवितेची नक्षी !!''

'' नको हट्ट हा, सखे थांब तू
शब्दांना ठेवून लांब तू
धाप गोड ही उरी असू दे
स्वप्नांहूनही खरी असू दे
असा तुझ्या असण्याचा दर्वळ
शब्दांना अर्थांची भोवळ !
नकोस मागू आता काही
देणाऱ्याला भानच नाही !
देणाराही...घेणाराही
अंतर आता उरले नाही !
उद्या सकाळी प्रकाश येईल
सारे हळवे घेऊन जाईल
दवासारखे उत्कट सारे
उद्या व्हायचे उन्हबावरे !
नकोच म्हणुनि काही मागू
पद्यातून गद्यासम वागू !

हट्ट नको आता शब्दांचा
क्षण हा मौनाच्या ओठांचा !
क्षण असला भाग्याने मिळतो
आयुष्याच्या सोबत जळतो
दिवा लागता या हृदयांशी
नको उधारी कवितेपाशी !
असेच मजला मूक राहू दे
जरी चूक हे; चूक राहू दे
पहाट राहो अशीच ही की
कवितेच्या बाहूत कवी मी !!
( अस्वस्थाचे अंतर्नाद उत्कटाच्या उन्हवेळा...)

-संदीप खरे