Thursday, November 17, 2011

चौथी भिंत

खूप बोललो आता एवढंच सांग
डोळ्यांतून लागतो का मनाचा थांग ?
आठव ना पक्ष्यांचे रंगीत थवे...
मी म्हटलं - ’चंचल असतात !’
तू म्हटलंस - "आपल्याला हवेत !!"
मग छाती फुटून धावलो...धावावंच लागतं...
हातातून हात सुटून जातात, दु:ख त्याचं असतं...

कसले गं सूर ? कसले शब्द ? सारंच थोटं...
जगण्याला नसतंच धड, असलंच तर ते थोटं !
हात आहेत, पण ते हलत नाहीत
त्यांना फुलं टोचतात, काटे सलत नाहीत !
हा तुझा अणुकुचीदार ’का?’ ठेवशील का बाजूला ?
भिंत बांधली गेली एवढंच खरं, एकेक वीट उपसा कशाला ?

तीन भिंती झाल्या होत्या बांधून
तेवढ्यात तू आलीस...
आणि अशी आत-बाहेर नाचते आहेस आता चिमणीसारखी
की चौथी भिंत बांधताही येत नाही......

मी ही धावायचो वार्‍यावर, उभा असायचो माळरानावर
मी ही पळायचो पक्ष्यांपाठी...माझ्याही घराला नव्हत्या भिंती...
असो ! आता स्पष्टीकरणे नकोत जास्त
माझीच माझ्यावर चालू आहे गस्त !

चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू आहे
अजून बांधून झाली नाही...
आत का बाहेर ते एकदाच ठरव
नंतर आतलं बाहेर नाही आणि बाहेरचं आत नाही......

अगंss भिंत असली तरी आकाश दिसतं;
आणि नीट बघीतलं तर आकाशात देव !
जगायला एवढं...अगदी एवढंच लागतं...

-संदीप खरे

2 comments:

  1. avadali aani share suddhaa keli
    dhanyavaad

    http://marathikavitaa.wordpress.com/2011/11/19/चौथी-भिंत-2/

    ReplyDelete
  2. धन्यवाद सुजित...ब्लॉगवर स्वागत

    ReplyDelete