Monday, July 22, 2013

निरोप

कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवटचा लेख (
१)
दुसरीतला एक मुलगा खूप अस्वस्थ आहे. पोटात सारखा गोळा येतोय त्याच्या...
डोळे आतून गरम झालेत. आजोळी आलाय काही दिवसांसाठी...
आणि आता थोड्याच वेळात पुन्हा घरी जायचंय...
७-८ दिवस खूप खेळलाय, मजा केलीय, लाड झालेत.
पण खरं सांगायचं तर आल्या दिवसापासून त्याला भीती वाटतेय ती याच क्षणाची..
आजीच्या कुशीत झोपताना, आजोबांची गोष्ट ऐकताना, दंगा मांडताना,
सतत त्याच्या मनात हा नकोनकोसा क्षण कधीचाच ठाण मांडून राहिलाय...
कितीही दुर्लक्ष करून खेळात रमायचा प्रत्यन केला तरी गाण्यामागे तानपुऱ्याचा षडज् लागून रहावा,
तसा हा 'निरोप' सारखा कावराबावरा करत राहिलाय त्याला.
लहानच आहे तो, पण निघताना पाया पडताना आजीचा हात जरा जास्तच मऊ झालाय
आणि आजोबांचे डोळे अजून सौम्य, ओले हे जाणवतंय त्याला. तो रडला नाही निघताना,
पण निरोपाच्या वेळी रात्रीच्या अंधारात सौम्य आवाजात सतत सरसरत राहणारा पाऊस
आणि मनात जे काही होतंय; या दोघांत उगाचच काहीतरी साम्य आहे
असं वाटत राहिलंय त्याला... अजूनही...!

२)
कॅन्सरच्या लास्ट स्टेज पेशंटला तो भेटायला गेला,
तेव्हा ज्यांच्यात तो थेट बघूच शकला नाही असे दोन डोळे वर वर शांत, निरवानिरव केलेले...
पण नीट पाहिले तर 'उन की आँखो को कभी गौर से देखा है 'फराज'? ...
रोनेवालों की तरह, जागनेवालों जैसी' या फराजच्या प्राणांतिक शेर सारखे ते डोळे?
आलेल्यांशी हसताना, बोलताना, उपचार म्हणून उपचार करून घेताना,
निसटणारा प्रत्येक क्षण भरभरून पाहण्याचा प्रयत्न करणारे डोळे...
खूप पहायचं राहून गेलं हे जाणवणारे डोळे...
'गत्यंतर नाही'च्या दगडी भिंतीपलीकडे पाहू न शकणारे डोळे.
त्या डोळ्यांना काय म्हणायचं? निरोप???

( ३)
शेवटचीच भेट दोघांची... उरल्यासुरल्या पुण्याईने मिळालेला ३-४ प्रहरांचा एकांत...
परिस्थिती अशी की आता हे एकमेकांत समरसून जाणं पुन्हा नशिबी नाही हे दोघांनाही उमगलेलं...
आपापली आयुष्यं खांद्यावर घेऊन दोन वाटांनी निघून जाण्यापूवीर् एकमेकांना भरभरून देण्याघेण्याची जीवघेणी धडपड. ही भेट 'मनस्वी' सुद्धा...
'देहस्वी'सुद्धा- पण 'आता पुन्हा कधीच नाही' हे वाक्य घड्याळ्याच्या लंबकासारखं प्रत्येक क्षणावर टोले देत राहतं... स्पर्शाच्या रेशमी मोरपिसांचे चटकेच मनावर उतरतात.

हात दोनच असतात आणि फुलांचे सडे तर अंगभर पसरलेले.
'जन्मभराची गोष्ट ३-४ प्रहरात नाही रे वेचता येत, राजा'- असहाय्य हात सांगत राहतात...
त्यानंतरही खूप दिवस जातात...
तो अजूनही संध्याकाळी गुलमोहराखाली उभा असतो...
आजकाल संध्याकाळही निरोप घेऊन निघून जाते.
तशी ती पूवीर्ही जायची... आताशा त्याला तेही जाणवतं. इतकंच!!

४)
बातमी आल्येय विजेसारखी. ती सुन्न होऊन बसल्येय... पचवताच येत नाहीये...
मांडीवरच्या छोटीला तर कसलाच अर्थ माहित नाहीये... बाबा.. अपघात.. मरण..
काही काही छोटीला कळत नाहीये...
आईच्या गार हातांचा, देहातल्या कंपाचा स्पर्श नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा इतकीच थोडी जाणीव!
रड रड म्हणतायत सारे पण आई रडतच नाहीये...
शेवटी थोड्या वेळानी आई स्वत:शीच पुटपुटते... ''जातो' म्हणून हे दार ओढून गेले,
तेव्हा आमटी ढवळत होते स्वयंपाकघरात... नीट निरोपसुद्धा नाही घेता आला...''
आणि मग तिचं उसासत फुटलेलं रडू!
मांडीवरची छोटी एका क्षणात तिच्याही नकळत मोठी होऊन गेल्येय...

( ५)
कुणाचंही काही नं ठेवलेला... देता येईल तेवढं आयुष्यभर देत राहिलेला म्हातारा...
आयुष्याच्या सरहद्दीपाशी सुद्धा कसा टपोरा, टवटवीत!! म्हणतो- 'देवाजीनं खूप दिलं...
सुखही आणि त्याची चव टिकावी म्हणून दु:खही! देवही झालो नाही आणि दानवही...
माणूस होतो; माणूसपण तेवढं टिकवलं! खेद कसला... खंत कसली!
नाटक थोडं आता पुढे सरकू दे की... एका प्रवेशात आख्खी गोष्ट कोंबायचा आटापिटा कशाला?
आणि शेवटचाच असला, तरी निरोपाचा एवढा आकांत कशाला?' खूप शहाणा आहे म्हातारा...
मरणाच्या रेघेशी स्वत: आयुष्याने निरोप द्यायला यावं इतका लाडका?
सत्यनारायणाच्या पूजेसारखा निरोप मांडून राहिलेला म्हातारा...
त्याला पुढला जन्म कुठला मिळणारे माहित्ये?
बोरकरांसारख्या कुठल्यातरी कवीच्या चिरंजीव कवितेचा...!!

६)
निरोप... कधी क्षणांचा... दिवसांचा.. वस्तूंचा.. वास्तूंचा... माणसांचा.. अवस्थांचा.
प्रसंगी अंगभूत कलांचा.. तर कधी अशा सदरांचा! खूप देऊन जाणारा...
काही घेऊन जाणारा! कितीही बोललो, काहीही केलं तरी जो कायम अर्धवट, अपुराच वाटतो...
तो निरोप! म्हणून तर काही बोलत नाही अधिक...
थांबतो! 'पुन्हा भेटूच' या मनापासूनच्या इच्छेसह!!

-संदीप खरे

Friday, July 19, 2013

रात्र रात्र सोशी रक्त...

खूप जागलो. इंजिनिअरिची सबमिशन्स, कधी कार्यक्रमांचे दौरे, नाटकाच्या रिहर्सल्स, 'बालगंधर्व'जवळ पुलावरच्या गप्पा, सायकलवरची भटकंती, कधी उगाचच एकट्यानेच वडाच्या पारावर दिलेला डेरा! एकदा तर शेवटची लोणावळा लोकल गाठून आम्ही ६-७ मित्रांनी मुद्दामून विनातिकिट प्रवास करून लोणावळा गाठलं. (ते थ्रिल कायदेशीररित्या इन्कमटॅक्स बुडवण्यात नक्कीच नाही!) टिसीनी पकडलं... त्याच्या केबिनमध्ये त्याच्याशी जिवाभावाच्या गप्पा मारल्यावर एक तासानी सोडलं. मग रात्र लोणावळ्याच्या बसस्टॅन्डवर घालवून, पहाटेची पुणे लोकल गाठली, ती लोणावळ्यापासून रेल्वे रुळावरून चालत जाऊन थेट मळवली स्टेशनवर! हरिश्चंदगड, रायगड, शिवनेरी सगळ्यांशी पहिली भेट घडली, ती रात्री वाटचाल करूनच!
...

मि. 'सूर्यवंशी', पहाट कधी पाहिल्येत का या जन्मात?'' आमच्या ओळखीचे एक 'नियमित काका' आहेत त्यांनी विचारलं! ते अगदी लहानपणापासून पहाटे उठतात, फिरायला जातात वगैरे. (रोज रोज इतकी वर्षे पहाटे पहाटे भेटून 'पहाट' यांना किती कंटाळली असेल ना! - असं आपलं उगाचच माझ्या मनात!) असो. त्यांचा तो 'स्वगर्वधन्य' प्रश्न ऐकून त्यांना म्हणालो - 'पाहिल्येत ना काका... खूप वेळा भेटलोय पहाटेला... पण काय आहे ना, पहाटेला नेहमी मागूनच मिठीत घेत आलोय मी!' त्यांचा नकळता चेहरा पाहून जरा विस्तार केला - 'म्हणजे असं, की पहाट आपली माझ्या बिछान्यात कुठे मी दिसतोय का शोधत असते आणि मी मध्यरात्रीची मुशाफिरी उरकून हळूच मागून येतो तिच्या आणि तिचा दवबिंदूच्या सुवासाचा चांदणशीतल देह हळूच कवेत घेतो... 'ती पण शहारते आणि मीही!!''

हे 'कलाकार जंतू' असलेच असा एक 'हन्त हन्त' भाव चेहऱ्यावर उमटवून ते निघून गेले... पण पहाटेसाठी काय छान सुचवून गेले काहीतरी!! ('ये खजाने तुझे मुमकिन है खराबों में मिले' ही ओळ जाम पटून जाते अशा वेळी...)

असो. पण खरंच रात्रीच्या या मुलीविषयी विचार करायला गेलं की किती किती आठवतं. खरं तर या आठवणी प्रत्यक्ष रात्रीच्याच... पहाट हे आपलं शेवटचं स्टेशन! मगाशी ते 'मध्यरात्रीची मुशाफिरी' म्हटलं ना, ते ऐकल्यावर काही जणांच्या भिवया उंचावू शकतात... पण ही त्यांना अभिप्रेत असलेली मुशाफिरी नक्कीच नाही! रात्रीचा प्रवास हा काही दरवेळी 'बदनाम' स्टेशन्सच घेतो असं मुळीच नाही!

रात्रीचं आणि माझं काहीतरी जमतंच एकूण... अगदी, मध्यरात्री जन्माला आलो होता ना, तेव्हापासून! अगदी सुरुवातीचं आठवतंय ते म्हणजे मी ६-७ वर्षांचा असताना, मला दामटवून झोपवता झोपवता 'दुष्ट' मोठी माणसं झोपी गेली की हळूच उठून छोट्याशा देव्हाऱ्यासमोर जाऊन बसे. गोष्टीची पुस्तकं कपाटात टाकून दिलेली असत, मग तिथलीच गजानन महाराजांची पोथी उघडून, देव्हा-यातल्या त्या एकमेव चालू असलेल्या क्षीण बल्बच्या उजेडात वाचत बसे. रात्र आपली होत राही! आणि मग त्यानंतर तर कसा कसा, किती किती आणि कशाकशासाठी जागलो ते आठवतंच नाही! आईनी कुरकुर केलीच तर 'या निशा सर्वभूताना'चा श्लोक ठरलेला! (माते, जेव्हा सारे जग झोपलेले असते, तेव्हा तुझ्या पुत्रासारखा संयमीच जागा असतो बरे!)

ऋतुगणिक रात्र बदलते ती ही किती अनुभवण्यासारखी! एखाद्या मुळात सुंदर मुलीनी कुठल्याही पेहेरावात सुंदरच दिसत रहावं तसं काहीसं! उन्हाळ्यात गच्चीवर निवांत गाद्या टाकून पहाटे गार पडलेल्या गाद्यावर, गोधडीच्या संकुचित, उबदार सीमाप्रदेशात स्वत:ला गुरफटवून घेणं असो किंवा हिवाळ्यात शेवग्याच्या झाडावरचे काळेभोर सुरवंट अवाक होऊन बघत, पोटातून गरम असलेली आणि आजीनी कालवून दिलेली मुगाची खिचडी दह्याबरोबर हाणताना आलेली सुखी उबदार जांभई असो, रात्र ही ग्रेटच! पावसाळ्यात मध्यरात्री पत्र्यावर सरसरणारा पाऊस तर ऐकावाच! मोठी सर आली की अक्षरश: गोंगाट मांडणारा, कधी बडा ख्याल मांडल्यासारखा खूप वेळ झिमझिमत राहणारा आणि थांबला तरी पागोळ्यातून थेंब थेंब तड तड वाजत राहणारा! मला तर अनेकानेक वाद्यांनी सजलेली, कधी हळुवार, तरी कधी एकदम भरभरून बोलणारी सिंफनी ऐकल्यासारखंच वाटत राहतं कित्येकदा!

या आणि अशा रात्रींनी किती कविता दिल्या आहेत मला... बाहेरचे कोलाहल शांत होत गेले की आतला एक एक दिवा हळूच पेटू लागतो. मग काहीतरी म्हणावसं वाटतं, काय म्हणायचंय ते हलकेच थोडंस दिसून येतं... मग हळूच शब्द येतात... विचारपूस करतात... कुठे, कसं बसू विचारतात... त्यांना हाताना धरून घरात घेतो... ते, मी आणि रात्र यांच्या गप्पा जमतात... चंद कधी पुनवेचा असतो, कधी बीजेचा तर कधी अमावस्येचाही; पण एव्हाना चांदणं ओसंडायला लागलेलं असतं ते खूप छान वाटू लागलेल्या मनाआतून! आणि मग जेव्हा पहाटेला मागून मिठीत घेतो, तेव्हा हळुचं तिच्या कानात कधी कधी एखादी प्रेमकवितासुद्धा गुणगुणू शकतो मी!

काय लाज लाज लाजते तेव्हा पहाट। सूर्य का उगवतो माहित्ये? जगाच्या कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यात अशी एखादी लाजरी, देखणी पहाट पाहता यावी म्हणून...!

-संदीप खरे

Wednesday, July 17, 2013

सिनेमाला न जाणे...

एकदा काय झालं...
एक होता ' तो ' ... एक होती ' ती ' ... आणि एक होता सिनेमा!
तिघांनी एकदा भेटायचं ठरवलं...
एकमेकांना पहायचं ठरवलं; ठरवलं; पण घडलं मात्र नाही...
कशाला तरी घाबरून, कशावर तरी रागावून ती आलीच नाही...
मग त्याने एकट्यानेच थिएटरसमोरच्या बाकड्यावर ठाण मांडलं...
ती येणार नाही माहित असून वाट पाहिली... ती आली नाहीच!
कधीच!
कुणी नव्हतंच बोलायला... मग त्याने त्याच्या हक्काचा कागद जवळ ओढला... कशासाठी कुणास ठाऊक; पण लिहू लागला...
--------

यु हॅव्ह टु बिलीव्ह...
प्रिय सहप्रवाश्या,
सिनेमाला न जाणे ही सुद्धा एक व्यथा असू शकते...

------

सा-याच व्यथादु:खांची दारं ठोठावून
विचारपूस करणारा मी... कुठल्याही व्यथेशी अस्पर्श राहू नये
याची काळजी घेणा-या
जगन्नियंत्याचे आभार...!
व्यथेच्या व्याख्यांवरून झालेले वादविवाद आठवतात का?
' डोक्यात पहिला रूपेरी केस दिसणे'
हीसुद्धा एक व्यथाच आहे
यावर वादविवाद रंगविताना
तू अधिकाधिक तेजस्वीपणे आशावादी बनत होतास...
असो...
' भरकटू नकोस' या तुझ्याच
चारी दिशांतून ऐकू येणाऱ्या उद्गारांची शपथ,
यंदाचा पावसाळा गर्भार आहे, प्रिय!
यु हॅव टू बिलीव्ह...
... या साऱ्या प्रकारावर थोडासा हस
आणि तुझ्या सबकॉन्शसमध्ये आणखी एक नोंद कर;
एवढ्याएवढ्यात मी जमाखर्च मांडायची हिंमत करतो आहे!
( उदाहरणार्थ... एक नकार जमा करायला
आयुष्यभराची एक जागा
खर्च करावी लागते; प्रिय!!)
एकमेकांमध्ये पावसाचा झिरमिरता पडदा धरून
तूही नव्हता का दिलास यासाठी थोडा दिलासा!!...
' चर्चा करताना चहा लागावाच का?'
लागावा प्रिय... चहा लागतोच!
शब्दांबरोबर जमिनीवरचे पाय सुटताना
' चहा गार होतोय' हे भान असावंच लागतं...
आणि याहीपलीकडे
कोणीतरी बरोबर असण्याची 'अव्यक्त' गरज ठणकते
तेव्हा चहाचा कढत घोट
आवंढा गिळायला उपयोगी पडतो... प्रिय...
गर्भार पावसाचे दिवस भरत आलेत, प्रिय
आणि तुझ्यासाठी एक सिनेमा राखून ठेवला आहे!
एका अविश्वासाची नोंद
मी राखून ठेवलेल्या राजिनाम्यासारखी
विचारांच्या वरच्या खणात जपली आहे!....
आय हॅव टू बिलीव्ह, प्रिय-
चालायला लागले की कोट्यवधी मैलांची अंतरं इंचाइंचाने का होईना
पण कमी होतच राहतात!
हे गर्भार पावसाचं त्रांगडं
तुझ्या उपरोधाच्या खंुटीवर टांगशीलही, प्रिय
पण 'गर्भार पाऊस प्रसवू शकेल एका मनाचा मृत्यूही'
या वाक्याने थिजशीलच थोडासा;
आय बिलीव्ह, प्रिय...!
त्रयस्थपणाची शाब्दिक चिरफाड करताना
एकमेकांच्या मृत्युचे दाखले नको देऊ या आपण;
ते असह्य होतील
इतके जवळ आलेलो नाहीत आपण
किंवा ते सहन होतील
इतके दूरही राहिलेलो नाहीत आपण...!
माझ्या प्रश्नांचे दोर माझ्याच हातात ठेवण्याची
सवय आहे मला...
भर पावसात निवांत चालायची सवय आहे मला
आणि माझ्या सवयी न बदलण्याची सवयही!
' भिजू नकोस ना ' हे शब्द कधीतरी
हाताला धरून खेचतीलही आडोशाला...
आय बिलीव्ह, प्रिय... मी वाट बघेन...
पाऊस... त्रयस्थ... फुलं... अविश्वास... सिनेमा...
' वाट बघणे ' हा स्वत:च एक रस्ता असतो, प्रिय ज्यावरून चालताना
कुठलेही वादविवाद, मतांतरे किंवा पर्याय संभवत नसतात!
लोकांच्या घरासमोर बांधलेली ' सहानुभूतीची कुत्री '
माझ्यावर अनेकवेळा भुंकली आहेत, प्रिय
आणि मी... हिंडता हिंडता भूकच थिजलेल्या भिकाऱ्यासारखा
निर्विकार हसू लागलो आहे....
पावलाखालचा जमिनीचा तुकडा जपावा
तसा ' वाट बघण्याची ' अक्षरे गिरवीत राहीन;
जगण्यासाठी काहीतरी घट्ट धरून ठेवणं भाग असतं, प्रिय!!
हा रस्ता... पाऊस... चहा... आपली अस्तित्व
कशी ठरल्यासारखी मिसळून आली आहेत!
आपलेपणाचा गंध हुडकावा लागत नसतो,
व्यथा हुडकाव्या लागतात प्रिय, स्वभावांच्या शपथा घालून!
आनंदाचे क्षण तर
फांदीफांदीवर लगडलेले असतात!
आणि तरीही मी आशावादी नाही;
कारण आशावादाची पाटी
वर्तमानात नेहमीच निराशेच्या तळ्यात उभी असते!
आनंदी म्हणून ओळखलं जाण्याचा
अट्टाहास कधीच नव्हता, प्रिय.... मी आनंदीच आहे....
... यु हॅव टू बिलीव्ह...
आय हॅव टू बिलीव्ह...
... सिनेमाला न जाणे ही सुद्धा एक व्यथा असू शकते!...

-संदीप खरे

Monday, July 15, 2013

ती

ती रुसलेल्या ओठांइतकी निश्चयी
डोळ्यांमधल्या बाहुलीपरी चंचल
गालावरल्या खळीसारखी लाडी
भाळावरल्या बटेसारखी अवखळ.....

ती रंगांनी गजबजलेली पश्चिमा
ती रात्रीचा पुनव पिसारा चंद्रमा
मेघांमधले अपार ओले देणे
ती मातीच्या गंधामधले गाणे......

ती यक्षाच्या प्रश्नाहूनही अवघड
ती छोट्याश्या परीकथेहून सोपी
कळीत लपल्या फुलासारखी अस्फुट
दवबिंदुंच्या श्वासांइतकी अल्लद....

ती गोऱ्या देहावर हिरवे गोंदण
ती रोमांचांच्या रानफुलांची पखरण
पावसातली पहाट हळवी ओली
ती सांजेच्या पायांमधले पैंजण.....

ती अशी का ती तशी सांगू कसे ?
भिरभिरती वाऱ्यावर शब्दांची पिसे !
ती कवितेच्या पंखांवरुनी येते
मनात ओला श्रावण ठेवून जाते........

-संदीप खरे

Saturday, June 15, 2013

थू तिच्यायला....

नाव…गाव…घर…

मी रमलोय खरा… पण हे माझं गाव नव्हे…
आणि मी सांगत फिरतो ना… ते माझं नाव नव्हे…
बदलायचंच आहे हे सारं…

माझ्या नावाच्या बॉक्समध्ये कसं पडत नाही एखादंही पत्र ?
का फक्त मीच लिहायचंय जीव तोडून… घुसमट सोसत ?
गाव गाठायचंय जिथे पत्ता नसूनही माझ्या दारात पडतील बोलकी पत्र…
आणि नावाचं काय…
सापडेलच चांगलंसं… फ्लॉवरपॉटमध्ये खोचलेलं
जोवर आतून फुलत नाही एखादी बाग
तोवर एवढ्यावरच भागवू !

हा कुलुपाआतला चौकोन
म्हणजे माझं घर नव्हे काही,
मी आपला असतो इथे दिवसरात्र;
अष्टौप्रहर भोगून काढतो
खाणं, झोपणं, टी. व्ही., गाणं…

……थू तिच्यायला !

पावसाळ्या रात्री ह्या चौकोनाच्या भोवती 
बेडकांची रांगच्या रांग डराव डराव करते ना;
तेव्हा वाटतं… आता हे
माझ्यानंतर ह्या भिंतीत राहतील 
माझी जायची वाट बघतात साले (?)
…………… माझ्याइतकीच (?)

कदाचित पुढच्या पावसाळ्यात
जेव्हा गोड पाण्याबरोबर
चार दोन खारट थेंब टपटपणार नाहीत त्यांच्या त्वचेवर
तेव्हा समजेल त्यांना
रिकामा पिंजरा
रावा उडोनि गेला !

इकडे बघ… हे बघ…
ते दूर डोंगरांच्या पलिकडे
जे न दिसणारं आहे ना
तिथे एक दगडी, शालिन, मऊ, जिवंत घर आहे
वाऱ्याच्या मापाचं… वारेमाप !
तिथे… तिथे जाणार मी…
सॉलिड ना…

जाणार… बदलणार… असं म्हणत म्हणत तसंच रहाणं….

थू तिच्यायला……

माझ्या गावात मध्यभागी मनोऱ्यावर
एक मोठं घड्याळ आहे
माझ्या घरातसुद्धा कवायत करणाऱ्या
दोन हातांचा गोल डबा आहे…
त्याच्या तालावर मी माझं नाव, गाव, घर आणि कंटाळा
शिवाशिवी खेळतात…
बदलणारंच आहे मी हे सारं…
नाव, गाव, घर……

थू तिच्यायला……

पहाट झाली का ?… झाली झाली….
'जाग' आली का ?… आली आली….
निघायचं का ?… निघा निघा….
कुलूप घ्या…किल्ली घ्या…कड्या लावा….
आता कशाला ? कशाला ?

थू तिच्यायला……

-संदीप खरे

Thursday, June 13, 2013

तेवढे तरी राहू दे

मी काय तुला मागावे, अन काय तू मला द्यावे
छे सखी निराशा कसली मागणीच नव्हती कसली

ती हीच हीच ती जागा अन ती हीच हीच ती वेळा
मी ग्रीष्म उभा जळणारा डोळ्यात तुझ्या घन गोळा
जा भिजवून सारी माती मृद्गंध मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…

ती सर्व स्वागते वाया प्राक्तनात नव्हती माया
मी स्पर्शही केला नाही तरी कशी आक्रसे काया
जा उत्तर घेऊन याचे अन प्रश्न मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…

तू चंद्रच होतीस अवघी मज म्हणून भरती
आली वाळूत काढली नावे लाटांत वाहून गेली
जा घेऊन जा ही भरती ती लाट मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…

-संदीप खरे

Sunday, January 13, 2013

शिवण

तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतोच आपण
एखादेचसे गाणे त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असले गाणे बऱ्याचदा रडता रडता ओठी येते
साधारणत: असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते...

आपले असे असतेच कोण ? एकदोन मिठ्या आणि चारदोन थेंब ?
असले गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...

रस्त्यावरून वाहणाऱ्यांच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतळ्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोडी चढते धार...

तसे दुकटे असतेच कोण ? सगळेच असतात आपले आपले
'आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले ?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपणसुद्धा गर्दीमध्ये सहसा मारवा गात नाही !
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे 
कवितांची आवड वेगळे....आणिक कविता करणे वेगळे !!

कवितादेखील असतेच कोण ? वाळूत मागे उरले पाय...
'असे कधी चाललो होतो' - याच्याशिवाय उरतेच काय ?

तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते
एकदा शिवण चुकली म्हणजे आत काय न बाहेर काय !
एवढेच होण्यासाठी तरी असले गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...

-संदीप खरे

Wednesday, January 2, 2013

तुझी पापणी

सहजच उठते तुझी पापणी
सहजच झुकते खाली अलगद
आणि आम्ही इथे बिचारे
एका नजरेमध्ये गारद !

पापणीत या फडफडणारी
खुळ्या जीवांची फुलपाखरे
वयात येती सूर्यकिरण ते
तुझ्या पापणीत थरथरती जे !

तुझी पापणी दिवसरात्रीच्या
मैफिलीतला पंचम गहिरा
लवलवता ती या हृदयाची
सतार होते दिडदा दिडदा

तुझ्या पापणीतून अडकली
'हो-नाही' ची अनवट कोडी
मिटून उघडे क्षणार्धात त्या
आमुच्यासाठी युगे थबकती !

तुझी पापणी हळवी, अल्लद
तरी आम्हाला भलता धाक
तुझी पापणी चुकवून देतो
नकळे कितीदा तुलाच हाक

सहजच आता उघड पापणी
सहजच सुटू दे आमचे प्राण
काय एकदा निकाल लागो
दिगंत होवो अंतर्धान !!

-संदीप खरे