Wednesday, December 19, 2012

पौगंड

मग मी त्यादिवशी भलताSSच विचार केला
'हे भलतेच !' असं म्हणालीच आई !
आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही !!...

पाण्याबरोबर वाहत आलो होतो मीही
पण ते कळलेच नव्हते आत्तापर्यंत
पंधरा-सोळा वर्षांची एकसंध बेशुद्धी;
आणि जागतो तो पाणी पोहोचलेच गळ्यापर्यंत !

पहाटे एकदा अचानक घुमू लागली बासरी
ऐकलेच नव्हते असे आत्तापर्यंत काही...
आणि अर्धवट झोपेतच...आठवले उगाचच...
बरेच दिवसांत आजोबांनी कुशीत घेतले नाही....

आठवले; पण तसे वाटले नाही काहीच
देहभर फडफडत होती एक नवीन कोरी वही
...'वर्गातली टप्पोर्या डोळ्यांची मुलगी'...
म्हटलं हं 'आवडते एवढंच...बाकी काही नाही...'

'जगाचे काय ?' असेही वाटले...
'माझे काय?' हे त्याहून जास्त !
आरशातून तरंगायचे देहभर डोळे...
वादळी...प्रसन्न...क्षणार्धात सुस्त...

दरीत संध्याकाळ मावळताना
ऐकली होती दरीभर सांडलेली सनई
वाटले होते- 'हेच जगणे !.....
झालो मोठे....थोरसुद्धा होऊ.....'
खूप वर्ष झाली आता...अजून सनईसुद्धा आवडते;
पण उसळत नाही आतून काहीच...
वाटते- नुसतेच बसून राहू....

पण भलताच विचार केला होता एकदा...
माझ्यामते तर जगावेगळा...
'हे भलतेच' असे म्हणालीही होती आई...

आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही.......

-संदीप खरे

No comments:

Post a Comment