Saturday, January 28, 2012

म्हातारपण

एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे

येत नाही म्हणत, ऐकू कान सोडून गेले
वाक्यामधले अधले मधले शब्द सोडून गेले

चष्मा खराब, डोळे खराब काही कळत नाही
मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही

जेवण संपवून दंताजींची पंगत उठली सगळी
जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवळी

कंप कंपनीचा संप करतात बोटे काही
कापत रहातो पायच नुसता , अंतर कापत नाही

देहसदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे
जूने झाले बांदे, तरी आखडून वाकतात खांदे

मन म्हणते, कशाला या अर्थ असतो काही?
मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही

शिवून घेतला सूट नवा , सवलती सकट
सुरकुत्यांचे क्रेप कापड , शिवणावळ फुकट

इतका सारा मेकअप , आता नाटकाला मजा
मुलगे झाले आजोबा अन मुलींच्या आज्ज्या

ओबड धोबड फणसा सारखे पिकत चालले क्षण
आवाज झालाय पावरी सारखा , शेवरी सारखे मन..

एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे

-संदीप खरे

No comments:

Post a Comment