Friday, July 9, 2010

म्हणून...

माणसांना गरज असते कोंबड्यांची...बक-यांची
वाघसिंहांना गरज असते हरणांची..सांबरांची
घुबडघारींना गरज असते उंदरांची..सशांची...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

कुणालातरी वाटले वंशाला दिवा हवा..
कुणाला तरी वाटले बहिणीला भाऊ हवा..
कुणालातरी वाटले घरात पाळणा हवा...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

आडनावाला नव्या कॉम्बिनेशनची गरज होती...
घराण्याच्या ओटीपोटाला गर्भकळांची हौस होती...
पृथ्वीवरल्या मानवी जननदराची सर्वसाधारण संख्या
एकाने कमी पडत होती
म्हणून आम्ही जन्मा आलो!

भूमीचा भार ५०-६० किलोंनी वाढवायचा होता..
भाजीवाल्याचा धंदा दरमहिना फुगवायचा होता..
डॉक्टरच्या बिलाचा आकडा दरमहिना इमानाने टिकवायचा होता...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

कारण काहीच नव्हते पण घडायचे होते...
घडणार नव्हते काहीच पण थांबायचे होते...
काहीतरी व्हायचे नव्हते पण काहीतरी व्हायचे होते...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

आभाळाला कुणीतरी विचारायला हवं...
सारं बघणा-याला "मी ही बघतोय" हे सुनवायला हवं...
तुझ्या सिस्टीमच्या बेसिकमध्येच घोळ आहे हे कुणीतरी
ठणकवायला हवं...
म्हणून आम्ही जन्मा आलो!

-संदीप खरे

6 comments: