Sunday, May 29, 2011

आई घरात नसते तेव्हा...

आई घरात नसते तेव्हा, घरात घरच नसते तेव्हा...
सगळे कसे होऊन जाते कोणी 'स्टॅच्यू' म्हटल्यासारखे...
शेल्फवरचे डबे सगळे होऊन जातात शिळे शिळे...
कढई राहते काकडलेली, फ्रिज म्हणतो 'ऊब दे'
टेप म्हणतो 'माझे गाणे मलाच ऐकू येत नाही'
शोकेसमधल्या वस्तू म्हणतात 'एका जागी गंमत नाही'
सगळे दिवे चालू राहतात फॅनसुद्धा राहतो फिरत
गिझर पोटी राहते भीती 'कोण बंद करील परत ?'
सगळे कपडे ओरडतात 'पाणी द्या, इस्त्री द्या'
शर्टवरची कॉलर म्हणते- 'कोणी माझी काळजी घ्या !'
केरसुणी तर खचून जाते, तिची 'धनिण' नसते आता
कोपऱ्यामधल्या कचरापेटीस दिवस दिवस उपास आता
छतावरचा कोळी म्हणतो -'बांधा घर ! गनिम नाही !'
भिंती म्हणतात, आमच्या आतून घर आहे वाटत नाही !'
धूळ म्हणते 'किती दिवस अशी वेळ शोधत होते !'
घरासकट मनावरती थर थर साचत राहते!...
आई घरात नसते तेव्हा...

घरामधल्या शांततेचा आता तडकत जातो पारा
देवापुढल्या समईचा उतरत जातो अवघा तोरा
माझी कविता म्हणते 'आता तुला डोळ्यात ठेवील कोण ?'
जगासाठी पिसा तू, तुला शहाणा म्हणेल कोण ?'

दाटून यावे दात मळभ आणिक पाउस पडूच नये
तसे कोंडत जाते मन आणिक मिळत नसते वारा !
आई नसते तरीही दिसते सगळी माया उभी परसात
एकाकीपण सांगत राहते -'भिंतींना डोळे असतात !''...
                                 ....आई घरात नसते तेव्हा
                                 घरात घरच नसते तेव्हा...

-संदीप खरे

5 comments: