Wednesday, November 30, 2011

समुद्राकाठच्या कविता

-१
हा समुद्र...
हजार लाटांनी समजावतो आहे या तटाला
तरीही त्याचे ’जमिनपण’
प्रत्येक लाटेला ओसरवताना
रंगीतच होते आहे अधिकाधिक......!

-२
बदलते,मावळते रंग
गोंदवून घेण्याचा
मनस्वी छंद या वाळूला
खूप जुना !

-३
त्या मावळत्या तांबड्या टिकलीला
हे कपाळ रोजचेच...
युगानुयुगांचे अभंग पातिव्रत्य !

-४
दूरवर विरघळते आहे
आणखी एक संध्याकाळ
समुद्राच्या पाण्यात...
...तू कुठे आहेस, प्रिय ?
बघ, हे जीवघेणे विरघळणे ......

-५
खूप वरचे स्वर लागताहेत आज
अचूक आणि भिजलेले...
त्यात हा समुद्राचा अखंड खर्ज...
असेच गाणे येईल ?

-६
जायची वेळ ! वारा सुटलाय...
माझी परतती पावलंही
त्रयस्थपणे पुसतो आहे हा समुद्र !
दुसऱ्याला रडवणारी
कसली ही स्थितप्रज्ञता......प्रिय ?

-७
मी नसेन
तेव्हाचा समुद्र पाहायचा आहे......

-८
मी नसताना
खडकांच्या गळ्यात हात टाकून
उदास ह्सत असेल हा...
...असेल ना, प्रिय ?.......

-९
येतो...साऱ्यांनो...येतो...

-१०
...हुरहुर...
...लाटेगणिक...
...लाटाभर...

-संदीप खरे

Thursday, November 24, 2011

हरकत नाही

"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

- संदीप खरे

Thursday, November 17, 2011

चौथी भिंत

खूप बोललो आता एवढंच सांग
डोळ्यांतून लागतो का मनाचा थांग ?
आठव ना पक्ष्यांचे रंगीत थवे...
मी म्हटलं - ’चंचल असतात !’
तू म्हटलंस - "आपल्याला हवेत !!"
मग छाती फुटून धावलो...धावावंच लागतं...
हातातून हात सुटून जातात, दु:ख त्याचं असतं...

कसले गं सूर ? कसले शब्द ? सारंच थोटं...
जगण्याला नसतंच धड, असलंच तर ते थोटं !
हात आहेत, पण ते हलत नाहीत
त्यांना फुलं टोचतात, काटे सलत नाहीत !
हा तुझा अणुकुचीदार ’का?’ ठेवशील का बाजूला ?
भिंत बांधली गेली एवढंच खरं, एकेक वीट उपसा कशाला ?

तीन भिंती झाल्या होत्या बांधून
तेवढ्यात तू आलीस...
आणि अशी आत-बाहेर नाचते आहेस आता चिमणीसारखी
की चौथी भिंत बांधताही येत नाही......

मी ही धावायचो वार्‍यावर, उभा असायचो माळरानावर
मी ही पळायचो पक्ष्यांपाठी...माझ्याही घराला नव्हत्या भिंती...
असो ! आता स्पष्टीकरणे नकोत जास्त
माझीच माझ्यावर चालू आहे गस्त !

चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू आहे
अजून बांधून झाली नाही...
आत का बाहेर ते एकदाच ठरव
नंतर आतलं बाहेर नाही आणि बाहेरचं आत नाही......

अगंss भिंत असली तरी आकाश दिसतं;
आणि नीट बघीतलं तर आकाशात देव !
जगायला एवढं...अगदी एवढंच लागतं...

-संदीप खरे

Sunday, November 13, 2011

डोंगळ्याचं जीणं !

"तुझ्याकडे तर दिसत नाही एखादीही डिग्री..."
पारावरच्या डोंगळ्याला मी विचारले -
"...आणि तरीही चांगला गलेलठ्ठ जगतो आहेस..."

तो थबकला
कसनुसं म्हणाला -
"छे ! आमचं कसलं आलंय...डोंगळ्याचं जीणं !"

"नाहीतरी काय एवढा फरक आहे ?"
मी म्हणालो...
आणि डोंगळ्यासारखा तुरूतुरू पुढे निघालो......

-संदीप खरे

Tuesday, October 11, 2011

दोघे नकळते

...ती म्हटली - ’ते आलेच ओघाओघाने...’
मी म्हटले - "तू कधी येणार ?-
- ओघाओघाने जाऊ दे
निदान एखादी बारीकशी धार ?"

...ती म्हटली - ’तुला काय ? आता खुश्शाल
झोपशील...’
मी म्हटले - " आमेन ! -
- अजून बरीच रात्र आहे शिलकीत...
मेणासारखा चटके खात
मेणबत्तीभोवतीच जमेन !!"

...ती म्हटली - ’कळतच नाही काय बोलतोस...
मी जातेच कशी !’
मी म्हटले - "ते आलेच ओघाओघाने...
आता रात्रीच्या मिठीत मी
आणि माझ्या मिठीत उशी !!".......

-संदीप खरे

Wednesday, October 5, 2011

धैर्य

जसं की...कांदा
कांद्याच्या आत वाटी...
वाटीच्या आत वाटी...
वाटीत वाटी...वाटीत वाटी...
कांदाणू...
परमकांदाणू...
आणखी आत...आत आsत...
अगदी आssत?...
माहित नाही......

जसं की...कांदा
त्याच्यावर हवा...
त्याच्याभोवती हवा...
हवेभोवती हवा...
तिचे थरांवर थर...
मग...निर्वात...
अंधार...
अंतराळ...
अंतराळं...
बाहेर...
अगदी बाsहेर...
अगदी बाssहेरचं?
माहित नाही......

...ती पडल्या पडल्या डोळाभर बघते मला
आणि मग डोळे मिटून हातांनी ’चाचपत’ राहते,
सध्या तिच्या असलेल्या हातांनी’
सध्या माझा असलेला चेहरा......
ही कविता खरं तर भीत भीत...
कापऱ्या कापऱ्या हातांनी
तिलाच लिहायची होती एकदा...
तिचं धैर्य होत नाही...माझं होतं...एवढंच !

- संदीप खरे

Saturday, October 1, 2011

सफरचंद

सफरचंदाने ना फक्त पडायचे असते
करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची-‍‍ना पिकल्याची
करायची नसते काळजी फांदीखालील बेसावध डोक्यांची
वेळ झाली कळताक्षणी सारा गर गोळा करून
फांदीवरच्या फलाटावरून झाडाचे गाव सोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

मग ते पाहून कुणाला गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सुचू देत-ना सुचू दे
सुचल्याच्या आनंदात तेच सफरचंद कापून खाऊ देत-न खाऊ दे
पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे
सुचणाऱ्यागत पडणाऱ्याने नोबेल‍‍-बिबेल मागायचे नसते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

विचार नसतो करायचा की स्थितीज ऊर्जेची गतीज ऊर्जा कशी होते
नसते चिंतायचे की मरणासारखे त्वरण सुद्धा अंगभूत असते
नियम माहित असोत-नसोत नियमानुसारच सारे घडायचे असते
जर सफरचंद असेल तर त्याने टपकायचे असते
जर पृथ्वी असेत ते तिने ओढायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने, की कुणीतरी हळूवार झेलावे
किंवा उगवावे थेट चंद्रावर, आणि मग पिसासारखे अलगद पडावे
पण एकेक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुरडायचे असते
अन् चिख्खल असो वा माती असो, दिवस असो वा रात्र असो, फळ असो वा दगड असो
एकाच वेगात मधले अंतर तोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

-संदीप खरे