Thursday, July 1, 2010

कोणीही नसतं...

कोणीही नसतं आपण पोहोचतो तेव्हा...
निघून गेलेले असतात मैफिलीचे प्राण !
रस्त्यावर उतरतो आपण
आपल्या निराश पावलांसकट
आपल्याच कविता आपल्याला म्हणून दाखवत
आणि आपल्याच शब्दांचे अर्थ
आपल्याच मेंदूच्या पेशीपेशीपर्यंत पोहोचवत...

रस्ताभर चमकत असतो
चांदण्यांचा चमचमणारा चिखल...
वेश्येच्या मनात विझून जावी चंद्रकोर
तसे नाकारत जातो आपण
कुठल्याही स्वप्नांचे स्वामित्व...
रस्त्यावरचे एकाकी कुत्रे
पहात असते त्याच्या करून टपोर्‍या डोळ्यांनी
आपल्या दमलेल्या श्वासांची आवर्तने...
एकेक ओझी कमी करूनही
वाढत चाललेला भार समजत नसतो मेंदूला...

हात सुटला की सुटते साथ
साथ सुटला की फाटते वाट
वाट भर दूर दूर
मृगजलांचे महापूर
सूर सुटला की महापूर;

कोणीही नसतं आपण एखादा महापूर झेलतो तेव्हा..
डोळ्यांच्या पातळीपर्यंत पोहोचलेल्या
लालगढूळ लाटांच्या पाठीमागून
सरकत जाताना दिसतात
किनार्‍यांमागून किनारे...

कोणीही नसतं आपण पोहोचतो तेव्हा...
मैफिल संपून गेलेली असते
किंवा सुरुच व्हायची असते अजुन कदाचित !
आणि आपणही नेहमीसारखेच
काळाच्या खूप मागचे
किंवा पुढचेही कदाचित...

...रस्त्यांवर उतरतो
आपल्या निराश पावलांसकट;
कुत्र्याच्या करून टपोर्‍या डोळ्यांमधले
एकटेपणाचे फूल खुडून घेतो
पाझरत्या रात्रीच्या खोल विहिरीत...

-संदीप खरे

2 comments: