Sunday, January 13, 2013

शिवण

तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतोच आपण
एखादेचसे गाणे त्यातले आतली शिवण उसवत जाते...
असले गाणे बऱ्याचदा रडता रडता ओठी येते
साधारणत: असल्या वेळी आपले कोणी जवळ नसते...

आपले असे असतेच कोण ? एकदोन मिठ्या आणि चारदोन थेंब ?
असले गाणे असल्या वेळी असलेच काही सांगत असते...

रस्त्यावरून वाहणाऱ्यांच्या नजरा जेवढ्या ओळखी देतात
पुतळ्यांच्या समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गर्दी होते आरपार
एकलेपणाच्या जाणिवेला आणखीन थोडी चढते धार...

तसे दुकटे असतेच कोण ? सगळेच असतात आपले आपले
'आपले आपले' म्हटले तरी आपण कुठे असतो आपले ?
असली ओळ एरवी कधी हातून लिहिली जात नाही
आपणसुद्धा गर्दीमध्ये सहसा मारवा गात नाही !
वेळेचीच ही गोष्ट आहे, असल्या वेळी वाटते लिहावे 
कवितांची आवड वेगळे....आणिक कविता करणे वेगळे !!

कवितादेखील असतेच कोण ? वाळूत मागे उरले पाय...
'असे कधी चाललो होतो' - याच्याशिवाय उरतेच काय ?

तरीसुद्धा कधीतरी शिवण उसवत जाते
एकदा शिवण चुकली म्हणजे आत काय न बाहेर काय !
एवढेच होण्यासाठी तरी असले गाणे मनात गावे
असले काही गुणगुणले की एकले काय नि दुकले काय...

-संदीप खरे

Wednesday, January 2, 2013

तुझी पापणी

सहजच उठते तुझी पापणी
सहजच झुकते खाली अलगद
आणि आम्ही इथे बिचारे
एका नजरेमध्ये गारद !

पापणीत या फडफडणारी
खुळ्या जीवांची फुलपाखरे
वयात येती सूर्यकिरण ते
तुझ्या पापणीत थरथरती जे !

तुझी पापणी दिवसरात्रीच्या
मैफिलीतला पंचम गहिरा
लवलवता ती या हृदयाची
सतार होते दिडदा दिडदा

तुझ्या पापणीतून अडकली
'हो-नाही' ची अनवट कोडी
मिटून उघडे क्षणार्धात त्या
आमुच्यासाठी युगे थबकती !

तुझी पापणी हळवी, अल्लद
तरी आम्हाला भलता धाक
तुझी पापणी चुकवून देतो
नकळे कितीदा तुलाच हाक

सहजच आता उघड पापणी
सहजच सुटू दे आमचे प्राण
काय एकदा निकाल लागो
दिगंत होवो अंतर्धान !!

-संदीप खरे

Sunday, December 23, 2012

पाऊस

गोष्ट सुरु होईल तेव्हा सुरु झाला पाहिजे.....
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे....
गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे...
नायिकेमागे धावताना दमला पाहिजे...
दोघांमधल्या रागासारखा
लटका लटका भांडला पाहिजे...
नंतर तिच्या डोळ्यांमधून
सर सर सांडला पाहिजे...

सुखदु:खाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना...
मध्येच भान यावे आणि पहावे तर पाऊस !
'हा कधी आला?' म्हणावे हसून...
मागे रेलून...डोळे मिटून....
मग आठवावी आपली एखादी गोष्ट-
- तर तिथेही...पाऊस !...

-संदीप खरे

Wednesday, December 19, 2012

पौगंड

मग मी त्यादिवशी भलताSSच विचार केला
'हे भलतेच !' असं म्हणालीच आई !
आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही !!...

पाण्याबरोबर वाहत आलो होतो मीही
पण ते कळलेच नव्हते आत्तापर्यंत
पंधरा-सोळा वर्षांची एकसंध बेशुद्धी;
आणि जागतो तो पाणी पोहोचलेच गळ्यापर्यंत !

पहाटे एकदा अचानक घुमू लागली बासरी
ऐकलेच नव्हते असे आत्तापर्यंत काही...
आणि अर्धवट झोपेतच...आठवले उगाचच...
बरेच दिवसांत आजोबांनी कुशीत घेतले नाही....

आठवले; पण तसे वाटले नाही काहीच
देहभर फडफडत होती एक नवीन कोरी वही
...'वर्गातली टप्पोर्या डोळ्यांची मुलगी'...
म्हटलं हं 'आवडते एवढंच...बाकी काही नाही...'

'जगाचे काय ?' असेही वाटले...
'माझे काय?' हे त्याहून जास्त !
आरशातून तरंगायचे देहभर डोळे...
वादळी...प्रसन्न...क्षणार्धात सुस्त...

दरीत संध्याकाळ मावळताना
ऐकली होती दरीभर सांडलेली सनई
वाटले होते- 'हेच जगणे !.....
झालो मोठे....थोरसुद्धा होऊ.....'
खूप वर्ष झाली आता...अजून सनईसुद्धा आवडते;
पण उसळत नाही आतून काहीच...
वाटते- नुसतेच बसून राहू....

पण भलताच विचार केला होता एकदा...
माझ्यामते तर जगावेगळा...
'हे भलतेच' असे म्हणालीही होती आई...

आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही.......

-संदीप खरे

Sunday, December 2, 2012

मित्र

मित्र म्हणायचा - "त्या पेनानेच लिही फक्त
जे झिडकारून, भीक म्हणून टाकेल अंगावर कोणी !
त्या पेनाच्या जिभेतच सापडतील तुला
फक्त पूर्णविराम बाकी अशी संपूर्ण गाणी..."

मित्र म्हणायचा - "अन लिही हवे तसे
जसे की लिहायचेच नव्हते तुला कधी काही
सहीपाशी भेटले दु:ख, तर म्हण हे माझेच लिहिणे
भेटले लोचट सुख तर म्हण- छे ! मी लिहिलेच नाही !!"

मित्र म्हणायचा - "प्रेमात पड पौर्णिमेला
अमावस्येशी टिकले तर चमत्कार म्हण !
मदाऱ्याच्या माकडासारखा सोपस्कार म्हणून
आतून राहत सुटा सुटा 'नमस्कार' म्हण !"

मित्र म्हणायचा - "सुंदर काय, कुरूप काय दोन्ही त्वचांखाली
वाहत असते तेच लाल, शिळे, नियमित रक्त
सेक्सी-बिक्सी म्हणतोस ज्याला, ते ही असते पार्थाSS
देवाघरचे एक सुंदर पॅकेजिंग फक्त !"

"इस्त्री करून अंगावरती कपडे ल्यावेत कडक
याहून नसते जगात काही दुसरे हसण्यासारखे !
भीक मागते पोर...त्याचे काळभोर डोळे
जगात नसते याहून काही दुसरे दुखण्यासारखे !!"

"पाऊस असतो स्वप्न केवळ, माती असते स्वभाव
खड्डे असतात रस्त्यांवरचे पाऊसकालीन अभाव !
इच्छा असतात रंगांसारख्या, सरड्यासारखे मन
जगणे असते निर्बुद्धाची कुंपणापाशी धाव !!"

मित्र म्हणायचा- "सांग एक मित्र होता कधी
पृथ्वीला डायनॉसॉरची स्वप्ने पडण्याआधी !
अमिबाच्या पेशीसारखा एकटा, सहज तरी
फाटत फाटत अनेक व्हायची भाळी होती व्याधी !!"

-संदीप खरे

Friday, November 30, 2012

मि.चंद्र आणि त्याची गँग

रात्रभर कल्लोळत होते मि. चंद्र आणि त्याची गँग...

दोन मजल्यांखाली , बंद दाराआडून, पडदानशिन खिडक्यांमधून सुद्धा
जेव्हा घरभर पसरल्या लाटांवर लाटा;
तेव्हा गुदमरून वळणावळणाच्या जिन्याने गच्चीवर पोहोचले.
पाहिले तर-
डोंगराच्या टेबलावर पाय टाकून बसलेल्या सावल्या
चमकत बागडणाऱ्या चटकचांदण्या वेट्रेसेस
आणि ज्यांची नावे नीटशी माहीत नाहीत
असे ध्रुव बिव तारे रात्र पिसत बसले होते !
रात्रभर कल्लोळत होते मि. चंद्र आणि त्याची गँग...

...
इतक्या 'वरच्या' लोकांत मिसळायची सवय नव्हतीच,
तेव्हा गेटवे औफ इंडिया वरून
ताज हौटेल पाहणाऱ्या माणसासारखा चेहरा करून
काहीतरी करत राहिलो-
बहुदा 'विचार' असेन....
झोप संपल्यावर येते ती जाग
आणि झोप न आल्याने विचारांचे जे माजते ते रण
आणि झोपेच्या अल्याडपल्याडचे हे दोघे
बेमालूम मिसळले तर ते जागरण....
...असे विचार करण्यापेक्षा झोपलो असतो तर बरे झाले असते !
कुत्री अखंड भुंकत होती तेवढे मात्र बरे वाटले;
चला, निदान कुणीतरी कशावर तरी आक्षेप घेते आहे !!.....
...
आस्ते आस्ते लपेटून घेत राहिलो थंडीच्या शालीवर शाली
पहिल्यांदा पातळ थर...मग जाड थर...मग बधिर थर...
इतक्या थंडीतही डासांची भूक मरत नाही का ?
किंवा इतक्या थंडीतही डासांची भूक का मरत नाही ?
का कोणतीतरी अमर गोष्ट दोन चेहऱ्यांनी वावरते आहे ?
दिवसा भूक आणि रात्री आशा ? किंवा व्हाईसवर्सा ? ......
....
मि. चंद्राच्या चिरुटाचे धुराचे लोट जमिनीवर येईस्तोवर
मध्यरात्र उलटून गेली....
मग मी त्याला धुके म्हणालो आणि
'धुक्यात आलीस भल्या पहाटे ' म्हणायचे कटाक्षाने टाळले !
अर्धवट जाग किंवा अर्धवट झोपेत
दु:खावर इतके थेट बोट ठेवू नये;
विशेषत: कवितेच्या हाताचे !.....
....
मग मी ठरवले की आता जागायचेच...तेव्हा झोप येऊ लागली...
तेव्हा मी मला आवडणाऱ्या मुलीला प्रेयसी मानून बघितले
स्वत:ला उच्चशिक्षित, स्थिरस्थावर प्रोफेसर मानून बघितले
आणि एकूणच जगण्याला दहाच्या पाढ्याइतके सोपे मानले....
फार झोप घसरते तेव्हा स्वत:ची इतकी फसवणूक क्षम्यच !....
या सगळ्या मानण्यांच्या धूसर आकृत्यांतून
छोट्याश्या गच्चीच्या चौकोनात
मी सैरावैरा खेळत राहिलो !
....
मला कोणी जागा म्हटले असते तर मी बोललो नसतो
आणि झोपलेला म्हटले असते तर ओरडलो असतो...
पण मि. चंद्राच्या गँगशिवाय नव्हतेच कोणी काही म्हणायला !-
आणि त्यांना तर अशा झिंगलेल्यांची सवय होती....
असे लोक अगदी निरुपद्रवी !
फार तर कविता करतील...सिगरेटी ओढतील...
आणि दिवसा नाहीच रहावले तर की झोपून जातील....
....
एवढे होईस्तोवर पहाट व्हायला अगदी थोडाच वेळ उरला
आणि धुके तर अगदी ओठांतून पोटापर्यंत !
साऱ्यांशी... म्हणजे प्रेयसी, माझे विद्यार्थी,
इतक्या पैशांचे काय करायचे ही विवंचना....
यांच्याशी झगडता झगडता पाय पोटाशी घेऊन
भिंतीला टेकून बसलो -
- तेव्हा अंगावरच्या काट्यांना घाबरून रात्र पळायच्या बेतात !
बाजूला वारा...कुठल्यातरी सावल्या...उलटे सुलटे शब्द....
फिकटसा प्रकाश आणि संथ, लांबलचक पांढरपणा.....
...
मग पायांनीच मला कधीतरी उचलले आणि खाली आणले 
तेव्हा आईच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह आणि दूध
दोन्ही एकदमच उतू गेले !
साली आपली जातच वटवाघळाची
असे तोंड न धुता बोललो
आणि माझ्या पारंपारिक, मध्यमवर्गीय गोधडीत
स्वत:ला खोलवर गुंडाळून घेतले...
मग दिवस आणि काहीतरी - बहुदा झोप - एकदम चालू झाले....

रात्रभर कल्लोळत होते मि. चंद्र आणि त्याची गँग...

-संदीप खरे

Sunday, September 16, 2012

मी ग्लासातील पाण्यावरती

मी ग्लासातील पाण्यावरती हळू एकदा मारून फुंकर
म्हटले पाहू होतो का ते जळ-वायूचा काही संकर
तरंग उठले फक्‍त जरासे,याहून काही नाही घडले
हासत हासत काच म्हणाली वारा इकडे पाणी तिकडे

मी काचांचे कुंड मनोरे टोलेजंगी बघता बघता
तोंड वासुनी मारत होतो तळव्याच्या चटक्यांशी गप्पा
तोंड वासले इतके की मग त्यात येऊनी पडले अंबर
गिळता अंबर जगास सार्‍या ऎकू आली माझी ढेकर

कधी एकदा लास होऊनी वेगासातून जाऊन आलो
नशीब ठेवून चक्रावरती फाश्यांसोबत गरगर फिरलो
इतका हारलो की स्वप्नांच्या छातीवरती आले दडपण
घामाघूम मी झोपेतंच अन्‌ लोळून आलो होतो घरभर

कार घेऊनी अलिशानशी कुणी कामिनी मला भेटली
बॉंड मला समजून पुढे अन्‌ अंगावरती जरा रेलली
दत्तगुरूंचे नाव घेऊनी ओठ ठेवले मी बोटांवर
आठवते मज हसला होता रस्तासुद्धा त्या स्वप्नावर

आणि एकदा असेच कोणी रागावून येता अंगावर
खाता खाता जोडे त्याचे हसूच आले मला अनावर
इतका हसलो इतका हसलो पाणीच आले डोळ्या झरझर
तोही हसला आणिक गेला अंगावरती टाकून भाकर

-संदीप खरे