Thursday, March 25, 2010

सारे अर्थहीन होता

वाटे खोडावासा देह
आणि उडू द्यावे रक्त
सामावून राहो जीणे
एका बिंदुमध्ये फक्त

आले तळहाती जीणे
झाले अती ओळखीचे
सारे रंग,सारे घाट
सरावाचे, माहितीचे!

आता भातुकलीतून
जीव रंगेनासा झाला
रावा हिरावासा उरी
साद देईनासा झाला

नको वाटू झाली आता
रोज आरशाला भेट
होत गडद चालली
भाळी आठीतली वाट

जीव ठेवावा रमता
असे काही नसतेच
सौंधातली संध्याकाळ
बोलू लागे भलतेच!

नको व्याख्या,ठोकताळे
नको कसली उपाधी
काळ्याभोर ओळींकाठी
माझी उरावी समाधी

सारे अर्थहीन होता
आला जगण्याला अर्थ
गेला अंधारला शब्द
तरी तो ही नसे व्यर्थ!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment